Total Pageviews

Monday, October 22, 2012

शोध सुरु आहे...देवाचा!

आस्तिक आणि नास्तिक... तसे दोनीही माझ्या जवळच्या मित्रांतीलच.. पण दोन्हींचे विचार वेग वेगळे.. एकाला परमेश्वर मूर्त रुपात देवालयात आहे अस वाटत तर दुसऱ्याला देवाच्या असण्यावरच आक्षेप आहे.
अशावेळी का कुणास ठाऊक पण नकळत आपण स्वतःलाच विचारू लागतो.. तू कोण आहेस? आस्तिक कि नास्तिक? खरच काय वाटत मला.
देवाच्या भरवश्यावर मी आजवर तरी काही सोडलेलं नाही. स्वतः मेहनत करून मिळवला सर्व पण मग मी कुठे देवाच अस्तित्व नाकारलं?? देवळात तर मीही जाते, कित्तीदा त्या मूर्तीशी वाद घातले, दोष दिले, संतापहि केला... आणि कधी कधी निरव मनःशांतीहि अनुभवली. पण साक्षात्कार कधी अनुभवला नाही... किंवा अनुभवला मी साक्षात्कारही... पण 'स्व' चा साक्षात्कार होता तो... स्वतःच्या कुवतीचा, कौशल्याचा, कर्तृत्वाचा साक्षात्कार होता तो..
चला देव आपल्याला दिसत नाही म्हणून आपण त्याच अस्तित्व नाकारुया पण मग ह्या सृष्टीचा रहाटगाडा चालतो तरी कसा? त्याच्या नसण्याचा तरी काय पुरावा?
आणि  जरी देव असला तरी त्याला हे कर्मकांड पटत असेल का?
त्या नास्तिक बुद्धीवाद्याचे विचार मन उद्विग्न नक्कीच करतात पण मग हजारो च्या गीनतीन वारी ला जाणारा तो सर्व सामान्य वारकरी?? त्याची श्रद्धा? त्याच्या भावना? त्याचं काय? त्यांना थोडीच कळतात हे युक्तिवाद?
देव, धर्म , सत्य हे शब्द खूप मोठे आहेत खर तर.. त्यावर बोलण्याची अजून माझी कुवतही नाही. पण मला समजून घ्यायचंय हे सारं!
कोण विधाता? कुणाची निर्मिती? आणि कुणाचा साक्षात्कार?
माझाच मलाच झालेला साक्षात्कार??????
आपण त्याच्याकडे कित्ती अपेक्षा करतो त्याच स्वतः कडून केल्या तर??असो प्रश्न इतके आहेत पण उत्तर अजून माहित नाहीत...
शोध सुरु आहे... त्याचा! देवाचा!

Tuesday, September 4, 2012

वंदावी तुझी पावले -- शिक्षक दिन विशेष


ह्या जगात सर्वात पवित्र, निर्मळ आणि निःस्वार्थ नाती दोनचं! एक मातेचं आणि दुसंर मास्तरांचं! आई जन्म देते तर मास्तर जीवन जगण्याची कला शिकवतात आणि आमचं सौभाग्य, ती कला शिकवणारे मास्तर दुसंर कुणी नसून तुम्ही आहात.
'आपण ह्या समाजाचे घटक आहोत आणि म्हणून त्या समाजासाठी काही केलं पाहिजे..' हे खुपदा ऐकलं होत पण त्याचा खरा अर्थ तुम्ही समजावून सांगितला. यापूर्वी खुपदा वाचलेले गांधी, विवेकानंद आज नव्यानी कळले. जीवनाचे खूप सारे संदर्भ तुम्ही समजावून सांगितले. प्रसंगी आमच्या भल्यासाठी स्वतः त्रास सहन केलात. कधी आईची माया दिली.. कधी बापाचा धाक तर कधी भावाचा आधार... सगळ्या भूमिका अगदी चोख बजावल्यात. एखाद्या जादूगारा प्रमाणे तुम्ही आम्हा सर्वांमधलं चांगल हुडकून ते समाज हितासाठी कसं वापराव हे नेमक शिकवलंत... कधी निराशेत धीर दिला आणि स्वप्न पाहण्याची नवी उमेद.. नुसती स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात ती पूर्ण करण्यासाठी ध्येय वेड होऊन स्वताला झोकून द्याव लागत हे ही तुम्हीच शिकवलत. 'बदललेल्या काळात काही संदर्भ जुनेच आहेत म्हणून बाळ सामान्यांच्या डोळ्यातला सूर्य जरी नाही बनू शकलीस तरी पणती हो. प्रकाशाने अंधार भेदाला जातो यावर लोकांचा विश्वास जागा ठेव. ' म्हणत कायम आम्हाला मार्गदर्शन केलंत. म्हणूनच तुम्ही आम्हा सर्वांचे दीपस्तंभ आहात!
अजूनही आठवतो तो शाळेतला तास... पाटील सर अत्यंत रंगवून 'कणा' कविता शिकवीत होते. कवितेमधला पूर प्रत्येकाच्या पापण्याच्या कडांशी आला होता आणि सरांनी कवितेचा समारोप केला, 'सर,पाठीवरती हाथ ठेवून नुसतं लढ म्हणा..!' पण खर सांगू का सर, पाठीवर नुसतं हाथ ठेवून उभारी द्यायला मास्तर पण तसा दमदार लागतो...तुमच्या सारखा!
" गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर:।

गुरूरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:॥ "
आणि असा गुरु मला लाभले हे माझ सौभाग्य! पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी रास्त प्रयत्न करण्याचा आशीर्वाद द्या सर..
--- शितू

Friday, August 31, 2012

बदल.... The Change!

सध्या सगळीचकडेचं बदलाचे वारे जोरात वाहू लागलेत...
बदल.... change.. अनिवार्य आहे. सगळी कडूनच system बद्दल असंतोष व्यक्त केला जातोय. काही ठिकाणहून त्यावर मात करण्यासाठी जोमाने प्रयत्नही चालू झालेत. अशावेळी मी ह्या परिस्थिती कडे एका third person point  of view नी पाहते आणि मन अस्वस्थ होत. मुठभर लोकांची धडपड आज करोडो भारतीयांचे आयुष्य बदलू पाहतेय. पण तरीही आपण शंढासारखे हातावर हात धरून फक्त गम्मत पाहतोय. air conditioned  खोलीत बसून बदल व्हावा म्हणून चर्चा करतोय. पण सुरुवात? ती कुणी करावी? कित्ती दिवस आपण कुणी तरी येऊन आपल्याला तारून नेईल म्हणून वाट पाहणार आहोत? कित्ती दिवस केवळ चर्चा रंगविणार आहोत? अणि कित्ती दिवस 'इस देश का कुछ नही हो सकता' म्हणून केवळ टिका करणार आहोत? कुणी तरी पुढे येईल आणि मग आपण मागून जाऊ.... का?
आपण करूयात ना सुरुवात...
आधी आपल मन साफ करू... मग घर... मग परिसर... आपोआप देश साफ होईल... कित्ती सोप सूत्र आहे... नाही? पण नाही... आपण त्याला कठीण बनवलंय... आपल्या सोयीसाठी...
लोकांची गर्दी केव्हा झाली कळल नाही मग सगळीकडे रांगा लागू लागल्या...मग आपोआप ती गर्दी...त्या रांगा चुकविण्यासाठी आपणच पळवाटा शोधून काढल्या.
भ्रष्टाचारी--- 'राजकारणी'... आणि आपण? दुसऱ्याला दोष देऊन आपण मोकळे होतो.... कित्ती सहज... कधी तरी अंतर्मुख होऊन विचार केलाय... 'मी स्वतः काय करतोय?'
कामात, शिक्षणात एकूणच सर्वात गुणवत्ता हवी... पण जे माझ्यातच नाही ते कामात कुठून येणार...? जे मीच देऊ शकत नाही ते मला मिळावं अशी अपेक्षा तरी किती रास्त आहे? कधी विचार केलाय?
कायमच अपेक्षा दुसऱ्यांकडून...का?
मी.... माझ्या पासून करूयात सुरुवात... बदलाची... कारण तुम्ही आम्ही मिळून एक system बनते... system आपल्यासाठी आहे... आपण system साठी नाही... 
आज एक पाऊल आपण पुढे येऊ.. आपण बदलू.. समाज आपोआप बदलेल...
कारण बदल अनिवार्य आहे..Change is Inevitable ...फक्त तो चांगल्यासाठी व्हावा हे महत्वाचं..





[ आज मला पुन्हा एकदा विश्वास वाटतोय... What do you think?
If yes then what are we waiting for... Let's change the world... :) :) ]

Saturday, August 4, 2012

रक्षाबंधन!

लहानपणा पासूनच ह्या सणाचं मला खूप अप्रूप राहिलंय...कित्ती तयारी करायचे...हातानी राखी बनविण्या पासून ती तुझ्या हातावर बांधी पर्यंत...आणि मग तुझ्या कडून मिळणार गिफ्ट.. खुपदा आधीच तुला आवर्जून hint दिलेली असायची कि मला काय गिफ्ट हवंय...आणि तू द्यायचासही... अगदी वर्ष्याच्या सुरुवाती पासून पैसे जमवायचास ना... त्यासाठी... दिसा मागे दिस आणि वर्षांमागे वर्षं सरली...
आज रक्षाबंधन आहे आणि आपण दोघे दोन वेगळ्या शहरात.... दादा तुझी खूप खूप आठवण आली... गावातल्या दुकानांवर इकडे खूप लगबग होती. सासुरवाशी मुली छान नटून भावाकडे जायला निघाल्या होत्या. पोरांच्या कपाळावर टिके आणि हातावर राख्या झुलत होत्या. मी हि घेतली एक राखी तुझ्यासाठी. पण त्यात ती राखी बनाविण्याची गम्मत नव्हती...एक एक धागा निवडून तो विणताना जणू आपल्या नात्यालाच विणायचे मी...आणि एवढ सर्व करतांनाही तुझ्या आवडीचा रंग...तुझ्या आवडीची design आणि बरंच काही ध्यानी ठेवाव लागायचं...त्यासाठी पैसे जमविताना कित्ती कसरत करावी लागायची...नेमका कुठे तरी रुपयाच कमी पडायचा... तो आई हळूच गल्ल्यात टाकून द्यायची...कळत-नकळत.. आज मात्र खूप options होते...designs होते... इतके कि मलाच प्रश्न पडला होतो नेमका घेऊ काय..? मग क्षण भर डोळे मिटले आणि तूला आठवलं.. साधासा तू... अगदीच कुणाच्या नजरेत भरावास असाही नाही पण अगदीच कुणी लक्ष देणार नाही असाही नाही... शांत.. संयमी... अगदी माझ्या विरुद्ध... आणि सगळ्यात साधी...नाजूकशी राखी उचलली मी....तुला आवडेल आणि शोभेल अशी... तुझ्या सारखीच...!
आजकाल राखी चटकन पोहचावी म्हणून courier करतात...मी ही केल...आणि घरी परतायला निघाले...
सगळ्या आठवणी जाग्या झाल्या...
तुझा जन्म...तुझं बालपण.. आपले खेळ... आपली भांडण.. चर्चा.. गप्पा... आणि बरंच काही...
खेळताना कित्तीदा धडपडायचास तू...लागायचं तुला...आणि रडायचे मात्र मी...आणि वर तू डोळे पुसून मलाच म्हणायचास, 'दिदू फार नाही ग लागलय.. रडू नकोस...' आणि मला लागल्यावर मात्र तुझ्या चेहऱ्यावर चिंता घर करायची... दाखवायचा नाहीस तू पण मला माहितीये कि त्रास तुलाही व्हायचा. तुझ्या यशात कित्तीदा उर भरून आला अभिमानाने आणि माझ्या अपयशात तू नेहमीप्रमाणे पाठीशी उभा होतास मला धीर देत...कधी कधी घाईत अधाशासारखे एकाच पानात खायला बसायचो...आणि शेवटचा घास आवर्जून एकमेकांसाठी ठेवायचो... आणि तो घास तसाच रहायचा.. काहीही खाऊ मिळाला कि त्याचे दोन भाग न सांगता व्हायचे.एक तुझा आणि एक माझा... ते कित्तीही सारखे असले तरी त्यात तुला वाटला म्हणून एक मोठा भाग तू मला द्यायचास.... पपांच्या budget मध्ये आपली खरेदी adjust व्हावी म्हणून तू नेमही 'सध्या काही नको' म्हणून मला खरेदी करायला सांगायचास...आणि माझी खरेदी दुरून कौतुकाने पहायचास...आणि तुझ्या खरेदीला मात्र माझ्याशिवाय कधीच नाही जायचास... शाळेत कित्तीदा तुझी स्पर्धा माझ्याशीचं व्हायची... आपली इच्छा नसतानाही...पण तू मात्र तुझं वेगळेपण सिद्ध केलस आणि तेव्हा सर्वांत जास्त खुश मी होते. आज पपा नाही म्हणणार नाहीत पण तरी 'का उगाच खर्च?' अशी ठाम टिपणी देऊन तू माझीच scooty वापरतोय, आनंदात...!
कस जमत रे तुला नेहमी अस दुसऱ्यासाठी जगायला? माझ्या आनंदात खुश व्हायला..? माझ्या संतापात ऐकून घ्यायला..? असमाधानाची साधी रेषाही नसते त्या शांत, निर्विकार चेहऱ्यावर...
आपल नात celebrate करायला आपल्याला हा खास दिवस लागत नाही कारण ते प्रत्येक श्वासागणिक जिवंत असतं, माझ्यात आणि तुझ्यात आपल्या आठवणीमधून..पण तरी आज तुझी खूप खूप आठवण आली....
मला माहितीये तू खूप आतुरतेने वाट पाहत असणार राखीची... आणि मिळाल्या बरोबर लगेच बांधून घेशीन...नंतर मग नेहमीसारखी जपून ठेवशील तिला, तुझ्या कपाटात...
आठवणी आठवणी आणि फक्त आठवणी...डोळे पाणावलेत लिहून...आणि मला माहितीये वाचून तुझेही डोळे आत्ता भरून आलेत... हो ना?
देवा माझ्या भावाला उदंड आयुष्य दे...त्याच्या स्वप्नांना आभाळाचे पंख दे आणि प्रयत्नांना तुझ्या आशीर्वादाची जोड दे... आणि मला काही नको...